शिरपूर (प्रतिनिधी) : नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गुरुवारी शिरपूर तालुक्यातील आदिवासीबहुल कोडीद गावाला भेट देत ग्रामसंवाद कार्यक्रमाद्वारे ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे का, याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
ग्रामसंवादादरम्यान नागरिकांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनांमधील ई-केवायसी संदर्भातील अडचणी, तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या केवायसी समस्यांबाबत विभागीय आयुक्तांसमोर आपली मते मांडली. महिलांनीही विविध योजनांमधील अडचणींची माहिती दिली.
यावेळी कोडीद येथील अंगणवाडी केंद्रांच्या समस्या, आदिवासी आश्रमशाळेची स्थिती आणि आगामी शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
तसेच वनपट्टाधारकांच्या ई-केवायसीची स्थिती, ॲग्री स्टॅक आणि पीएम-किसान योजनेचा लाभ मिळत असल्याबाबत चौकशी करण्यात आली. गावातील प्रमुख कृषी पिके, खत व बियाणे पुरवठ्याची उपलब्धता याचीही माहिती त्यांनी जाणून घेतली.
यावेळी विभागीय आयुक्तांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकान आणि सेतू केंद्राची पाहणी करून नागरिकांना सेवा देताना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. शासनाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना वेळेत आणि प्रभावीपणे मिळण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















