शिरपूर (प्रतिनिधी):
शिरपूर तालुक्यातील प्रधानदेवी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला तब्बल दहा दिवसांनंतर शिरपूर तालुका पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने प्रकरणाला महत्त्वाचा कलाटणी मिळाली आहे.
दि. ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी पमा झंझाड्या पावरा (रा. प्रधानदेवी) याने आपल्या पत्नीला घराजवळील नाल्यात नेऊन लाकडी दांडक्याने डोक्यावर तसेच हात-पायांवर बेदम मारहाण करून तिचा खून केला. या घटनेनंतर मयत महिलेचे भाऊ आसाराम भायला सेनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडताच आरोपी फरार झाला होता. पोलिसांचा शोध चुकवण्यासाठी त्याने स्वतःचा मोबाईल बंद ठेवून ठिकठिकाणी वास्तव्य बदलले, त्यामुळे आरोपीचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते.अखेर दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी कपडे व आवश्यक सामान घेण्यासाठी प्रधानदेवी येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे व गुन्हे शोध पथकाने आरोपीच्या घराजवळ सापळा रचला. रात्री सुमारे ११.३० वाजता आरोपी गावात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात कसून चौकशी केली असता, पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने आपणच हा खून केल्याची आरोपीने कबुली दिली. या कबुलीमुळे संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रभावी कारवाईमुळे फरार आरोपीला जेरबंद करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे हे करीत आहेत.
सदर धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (धुळे), अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे (धुळे) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी (शिरपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बसावे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील संतोष पाटील, संदीप ठाकरे, भुषण पाटील, योगेश मोरे, संजय भोई, सुनील पवार, स्वप्निल बांगर, विजय ढिवरे, गुरदास बडगुजर, मनोज नेरकर, कृष्णा पावरा तसेच चापोहेकॉ अल्ताफ मिर्झा व गिरधर पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















