शिरपूर/प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोट्यामोठ्या ठिकाणी कारवाया करून दाखवण्याचा देखावा होत असताना, मोठ्या स्तरावर चालणाऱ्या अवैध वाहतुकीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक, वाहतूक व्यावसायिक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.
आरती गार्डन–कस्तुरी गार्डन परिसरातून रात्रीतून ‘बैठकी’? स्थानिकांनी पुढे आणलेली सर्वात गंभीर बाब म्हणजे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांचे रात्री उशिरापर्यंत आरती गार्डनमध्ये बसणे, तर दुसऱ्या दिवशी कस्तुरी गार्डनमध्ये दिसणे. “हे नेमके कोणत्या कामासाठी?” असा थेट प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हायवेवरील वसुलीचा आरोप — अवैध वाहतूक मात्र सुरूच! शिरपूर परिसरातून जाणाऱ्या नॅशनल हायवेवर उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची थांबवून होणारी ‘वसुली’ हा अनेकांचा अनुभव. परंतु या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असतानाही मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध मद्य वाहतूक मात्र कोणत्याही कारवाईशिवाय धडधड सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
“छोटी दुकाने, छोटे धंदे यांच्यावर मोहीम चालते… पण कोट्यवधींच्या अवैध वाहतुकीवर कारवाई कोठे गायब होते?” — असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून सार्वजनिकपणे विचारला जात आहे.
यंत्रणा नेमकी कोणाच्या दबावाखाली? राज्य उत्पादन शुल्क विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे अनेकांचे मत आहे.
छोटे–मध्यम स्तरावरील विक्रेत्यांवर धाडी
तर मोठ्या गाड्या, मोठे रॅकेट, हायवेवरील अवैध मद्य वाहतूक यावर कारवाई नाही यामुळे विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेला आहे.
जनतेची मागणी — कुंपणच शेत खात आहे का? तालुक्यातील नागरिकांची मागणी स्पष्ट आहे – ➡️ अवैध वाहतुकीला आळा घालणारी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवा ➡️ हायवेवरील संशयास्पद हालचालींवर सतत देखरेख ठेवा ➡️ प्रामाणिक अधिकारी नेमावेत व कार्यपद्धती पारदर्शक करावी
शिरपूर तालुक्यात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणीही वेगाने जोर धरत आहे. नागरिक म्हणतात, “कायद्याची काठी सामान्यांवरच चालणार का? मोठ्या रॅकेटवरही तीच ताकद दाखवली पाहिजे!”

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















