शिरपुर (प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील थाळनेर-भोरटेक मार्गावर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार तरुणाचा तीन चाकी वाहनाखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, थाळनेर येथील ईश्वर निळकंठ कोळी (वय ४२) हे गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास आपल्या मोटरसायकलने भोरटेक गावाकडून थाळनेरकडे येत होते. त्याचवेळी मुडावाद येथील महादेव मंदिराचे दर्शन घेऊन काही महिला GJ-21-V-6857 क्रमांकाच्या तीन चाकी वाहनाने होळनांथे गावाकडे परतत होत्या.
दरम्यान, भरधाव वेगातील तीन चाकी वाहनाचे टी-पॉइंटजवळ नियंत्रण सुटले. समोरून येणारे वाहन पाहून ईश्वर कोळी यांनी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवली होती. मात्र, नियंत्रण सुटलेल्या वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तीन चाकी वाहन मोटरसायकलवर पलटी झाल्याने ईश्वर कोळी हे वाहनाखाली दबले गेले.
घटनास्थळी उपस्थित महिलांनी व ग्रामस्थांनी तातडीने वाहन उचलून जखमी ईश्वर कोळी यांना बाहेर काढले. मात्र, अपघातानंतर वाहन चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे. भोरटेक परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती ईश्वर कोळी यांना मृत घोषित केले.
मयत ईश्वर कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व चार मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे थाळनेर परिसरात शोककळा पसरली असून रात्री तापी नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय भाटेवाल करीत आहेत.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















