शिरपूर | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या थेट गावपातळीवर सोडवून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल विभागाने सुरू केलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत दहिवद येथे आयोजित समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 800 हून अधिक लाभार्थींनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे आयोजन मा. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि मा. उपविभागीय अधिकारी शिरपूर श्री. शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, उपसभापती शेखर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली
शिबिरात सेतू शाखेमार्फत उत्पन्न दाखले, अधिवास व जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी शाखेकडून मंजूर प्रकरणांची वाटपपत्रे देण्यात आली. पुरवठा विभागाने नवीन व दुबार शिधापत्रिकांचे वितरण केले, तर बालविकास विभागामार्फत बेबी किटचे वाटप करण्यात आले.
कृषी विभागाकडून ट्रॅक्टर अनुदान लाभार्थींना मंजुरी देण्यात आली तसेच माती परीक्षण अहवालही वितरित करण्यात आले. वनहक्क धारकांचे केवायसी देखील यावेळी पूर्ण करण्यात आले.
“योजनांचा लाभ गावातच मिळाल्याने समाधान”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तहसीलदार महेंद्र माळी यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शासनाच्या विविध सेवा व योजना गावपातळीवर उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी दहिवद मंडळातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















