शिरपूर | प्रतिनिधी
सध्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा सुरू असून लवकरच इयत्ता १० वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. या महत्त्वाच्या काळात विद्यार्थी आपले भविष्य घडवण्यासाठी रात्रंदिवस अभ्यासात गुंतलेले आहेत. मात्र, लग्नसराई, धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका तसेच डीजे व बँडच्या मोठ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
शिरपूर शहरातील सर्व सुजाण नागरिक, मंगल कार्यालय मालक, बँड पथक, डीजे चालक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजकांनी सामाजिक भान ठेवून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरवासीयांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली असून, हीच समजूतदार परंपरा पुढे कायम ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पोलिसांचे स्पष्ट निर्देश
वेळेचे बंधन: रात्री १०.०० ते सकाळी ६.०० या वेळेत कोणत्याही प्रकारची ध्वनीवर्धक साधने (डीजे, लाऊडस्पीकर, बँड) वापरणे कायद्याने गुन्हा आहे.
आवाजाची मर्यादा: दिवसा देखील संगीत वाद्यांचा आवाज मर्यादित ठेवावा, जेणेकरून परीक्षार्थींना त्रास होणार नाही.
परवानगी अनिवार्य: कोणतेही ध्वनीवर्धक साधन वापरण्यापूर्वी रितसर पोलीस परवानगी घेणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांचे हित: घरातील व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानापासून संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) तसेच संबंधित ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिरपूर बाबा शहरवासीयांना साद
“विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही दिवसांचा संयम आवश्यक आहे. आपण सर्वांनी आदर्श नागरिक म्हणून जबाबदारीने वागून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन शिरपूर शहर पोलिसांनी केले आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















