शिरपूर | प्रतिनिधी :
शिरपूर तालुक्यातील थाळनेर, अजनाड, सावेर, बभळाज, तरडी, होळनांथे, भाटपुरा आदी अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, पपई, गहू, मका, हरभरा यासह विविध पिके अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ही घटना दि. 27 जानेवारी 2026 रोजी दुपारनंतर घडली असून अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी पिके आडवी झाली, तर जोरदार गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही भागांत शेतांमध्ये पाणी साचून पिके कुजण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम दादा पावरा यांनी नुकसानग्रस्त गावांचा आढावा घेत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. गावागावातील तलाठी व कृषी सहाय्यकांनी तात्काळ पंचनामे सुरू करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी तसेच अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपले नुकसान प्रशासनासमोर मांडत, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली.
शेतकऱ्यांचा आक्रोश
या गारपीट-वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णतः नष्ट झाली असून, तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक काही मिनिटांत उद्ध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मदतीची मागणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांनी केली आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















