शिरपूर (प्रतिनिधी) : शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काशिराम पावरा यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी (दि. २ एप्रिल) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीने शिरपूर शहरासह तालुक्यात हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे तसेच काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.
अहिल्यापूर परिसरात तासभर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडल्याने दुर्दैवी घटना घडली असून एका शेतकऱ्याची बैलजोडी मृत्यूमुखी पडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी शिरपूर तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्यामकांत ईशी, मंडळ अध्यक्ष विरुपालसिंग राजपूत, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया, माजी सरपंच सुनिल पाटील, पोलीस पाटील पंकज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तहसीलदारांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत तलाठी व कृषी सहाय्यकांना नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, भारतीय हवामान विभाग यांनी आधीच राज्यात पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















