शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत शिरपूर तहसील कार्यालयाच्या वतीने ‘समाधान दिवस’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणे हा असून नागरिकांच्या विविध महसूल विषयक समस्यांचे तात्काळ निवारण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित अनेक सेवा एकाच ठिकाणी आणि जलदगतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेषतः फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी असलेले उतारे, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन अशा महत्त्वाच्या सेवांचा समावेश या शिबिरात करण्यात आला आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दप्तर वाटप, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, पाणी व रस्त्यांशी संबंधित प्रशासकीय मान्यता, ई-मोजणी अर्ज, पीएम किसान नोंदणी तसेच भूसंपादन आणि अकृषिक प्रकरणांबाबत मार्गदर्शन देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना महसूल कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मंडळनिहाय समाधान शिबिरांचे नियोजन
अर्थे – 09 मार्च 2026
कोडीद – 12 मार्च 2026
थाळनेर – 14 मार्च 2026
जवखेडा – 18 मार्च 2026
मिठोडे – 24 मार्च 2026
बोराडी – 08 एप्रिल 2026
सांगवी – 10 एप्रिल 2026
दहिवद – 14 एप्रिल 2026
करवंद – 16 एप्रिल 2026
शिरपूर – 02 मे 2026
होळनांदे – 14 मे 2026
हा उपक्रम तहसीलदार महेंद्र माळी आणि उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या महसूल विषयक समस्या, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जांसह ‘समाधान दिवस’ शिबिरात उपस्थित राहून त्वरित निवारण करून घ्यावे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















